समुद्रपूर,
sameer kunawar तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने या गावकऱ्यांना उघड्यावरच अन्त्यविधी पार पाडावा लागतो. या ठिकाणी वनविभागाची जागा उपलब्ध आहे, पण कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. आमदार समीर कुणावार यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित करून जागेची गंभीर समस्या दूर करण्याची मागणी केली.
तालुक्यातील अनेक गावांलगत वनविभागाची जमीन उपलब्ध आहे. मात्र, स्मशानभूमीसाठी परवानगी नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाच्या जमिनीवर स्मशानभूमीस परवानगी देण्याचा समावेश केंद्र शासनाच्या धोरणात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मान्य केले. केंद्र सरकारशी चर्चा करून महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येईल तसेच वनविभागाची जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.