आर्वी
shakuntala railway आर्वीकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शकुंतला रेल्वे (पुलगाव-आर्वी मार्ग) प्रकल्पाने अखेर ब्रॉडगेज परिवर्तनाकडे आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन पूर्वीप्रमाणेच ५० टक्के आर्थिक हिस्सा उचलण्यास तयार असल्याची माहिती विधानपरिषदेत देण्यात आली असल्याचे आ. सुमित वानखेडे यांनी कळवले आहे.
आ. सुमीत वानखेडे यंाच्या सातत्यपूर्ण आणि शर्थीच्या प्रयत्नांनी या रेल्वे मार्गाचा विषय एक पाऊल पुढेे सरकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेबाबत सूतोवाच केले होते, त्याचीच ही फलश्रुती मानली जात आहे. आ. वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच या रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळाली असून अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
शकुंतला रेल्वे हा या भागाचा shakuntala railway गौरवशाली इतिहास आहे. ब्रिटीशांच्या काळापासून वाफेच्या इंजिनावर धावणारी ही रेल्वे पुढे बदलत्या काळानुसार डिझेल इंजिनवर धाऊ लागली. कापूस आणि स्थानिक व्यापाराची मोठी धुरा वाहणार्या या रेल्वेने अनेक दशके सेवा दिली. परंतु, काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ही जीवनवाहिनी पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे आर्वीकर भावुक झाले होते आणि ती पुन्हा सुरू व्हावी ही संपूर्ण परिसराची तीव्र इच्छा होती. हा रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून राज्याचा ५० टक्के आर्थिक वाटा देण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता केंद्र सरकारकडून याला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.