नवी दिल्ली,
anil ambanis company केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) लेखी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर रिलायन्स कॅपिटल लिमिटेड(मुंबई), तिचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. या गैरप्रकारामुळे १,००७.५५ कोटींचे नुकसान आणि ८०८.६७ कोटी रुपये व्याजाचे दायित्व निर्माण झाले आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ईपीएफओच्या तक्रारीनुसार, २०१३ आणि २०१४ दरम्यान रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने सुरक्षित नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जारी केले होते. यामध्ये ईपीएफओने रिलायन्स कॅपिटल ॲसेट मॅनेजमेंटसह चार पोर्टफोलिओ व्यवस्थापकांमार्फत २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स २०२३ आणि २०२४ मध्ये परिपक्व होणार होते. आरोपींनी फसवणुकीचे व्यवहार करून निधीचा गैरवापर केला़ त्यामुळे रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला एनसीडीची परतफेड करता आली नाही. परिणामी, ईपीएफओला एकूण १,८१६.२२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आराेपही करण्यात आला आहे.