जम्मू,
Chhattisgarh labourers killed in Kulgam जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बाहेरील मजुरांना लक्ष्य करत भीषण हल्ला केला. केल्लम परिसरातील एका विटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन हिंदू मजुरांची ओळख विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दीपक रात्रे (२४) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या भूपिंदर (२८) यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी केल्लममधील विटभट्टीवर धाड टाकली. त्यांनी प्रथम दोन्ही मजुरांची ओळख पटवली आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी भूपिंदर यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) येथे हलविण्यात आले. मात्र, छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागल्याने उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.हल्ल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी घटनास्थळासह परिसर सील केला आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गेल्या दहा दिवसांतील दक्षिण काश्मीरमधील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी २२ जुलै रोजी अनंतनागच्या लाल चौकात अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा बंदोबस्तावर तैनात असलेले भारतीय दंड संहितेच्या तिसऱ्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. एप्रिल २०२५ मध्ये पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धर्माच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला असून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही घटनेचा निषेध केला असून पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी सुरक्षा दलांना दिले आहेत. दरम्यान, बाहेरील मजुरांवर झालेला हा पहिलाच हल्ला नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये श्रीनगरच्या शहीदगंज परिसरात पंजाबमधील दोन मजुरांचीही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अशा घटनांमुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.