वर्धा,
wardha-goras-bhandar : अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईमुळे बंद पडलेले गोरस भंडार आज शनिवार १ ऑगस्टपासून वर्धेकरांच्या सेवेत पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ५ हजार लिटर दूध संकलन झाले असून गोरसपाक, पेढा, ब्रेडचे उत्पादनही सुरू झाले असल्याची माहिती व्यवस्थापक माधव कडू यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाने महात्मा गांधींनी सुरू केलेल्या गोरस भंडारमधील अस्वच्छतेवर ठपका ठेवत कारवाई केली होती. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाचे सांगलेच कान टोचले होते. त्यानंतर तब्बल दोन महिले बंद असलेले गोरस भंडार न्यायालयाने ७ जुलै रोजी सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
या कालावधीत गोरस भंडार प्रशासनाने गोरस भंडारच्या बेकरी विभागात टाइल्स आणि मार्बल बसविले. किचनचा भाग देखील दुरुस्त करून अधिक आकर्षक केला. दूध विभागात ‘ग्राउंड सरफेस’सह भिंतीला टाइल्स लावल्या आहेत. नव्या टाइल्स, नाली बांधकाम, रंगरंगोटी, नवीन शेडची निर्मिती, वॉटर फिल्टर आदी कामे पूर्ण केली आहे.
दोन महिने गोरस भंडार बंद असल्याने संस्थेला तब्बल ५० लाखांचा तोटा झाल्याचे कडू यांनी सांगितले. दररोज घरोघरी येणारे दूध बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. वर्धेचा गोरस पाक सातासमुद्रापार गेला आहे. याची चवसुद्धा चाखता आली नाही.
आज शनिवार १ ऑगस्टपासून वर्धेकरांच्या सेवत गोरसभंडार सुरु झाले. पहिल्याच दिवशी ५ हजार लिटर दूध संकलन झाले. गोरस पाक, ब्रेड, पेडाचे उत्पादन सुरू झाले असून शहरातील ११ सेंटरवर सर्व पदार्थ उपलब्ध असल्याचे सांगितले.