वर्धा,
government medical college हिंगणघाटमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय हे केवळ शहरापुरते मर्यादित राहणार नसून ग्रामीणांसाठीही आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. या रुग्णालयामुळे नागरिकांना उपचारासाठी वर्धा किंवा नागपूरकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही ऐतिहासिक बाब ठरेल. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दिशेने हे रुग्णालय महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
हिंगणघाट येथे नव्याने बांधण्यात येणार्या ४०० खाटांच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, संजय गाते, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ आदी उपस्थित होते.
ना. गोरे पुढे म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे आणि ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंगणघाटमध्ये ४०० खाटांचे रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज व्हावे, हे आ. कुणावार यांचे स्वप्न असून त्यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या या रुग्णालयाची नोंद हिंगणघाटच्या विकासाच्या इतिहासात निश्चितच होईल, असेही ते म्हणाले.
आजनसरा देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आजनसरा देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊ, असे सांगून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
आ. कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे government medical college ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत असल्याने या भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावरच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास ना. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला. तर अत्याधुनिक सुविधा असलेले ४०० खाटांचे रुग्णालय हिंगणघाटच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असे मत पालकमंत्री भोयर यांनी व्यक्त केले. शहरात ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे गेल्या २० ते २५ वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर साकार होत असल्याने हा स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ.सुमंत वाघ यांनी केले.