सातारा
rajgarh accident tragedy सातारा जिल्ह्यातील पुणे-सातारा महामार्गावर मंगळवारी पहाटे शिरवळजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे १.१५ वाजता हा अपघात झाला. भरधाव वेगातील टाटा नेक्सॉन कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी झाली आहे. हे सर्वजण मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित कार साताऱ्याच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मृतांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
दरम्यान, मध्य प्रदेशातील राजगड येथे झालेल्या भीषण अपघातानेही एका संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांचे मृतदेह उशिरा रात्री सतवास येथे आणण्यात आले. सर्व मृतदेह सतवास येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.
एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने धांसड गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतदेह सतवास येथे पोहोचताच नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रोश सुरू झाला. मृतदेह पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि वातावरण अत्यंत हृदयद्रावक झाले.मिळालेल्या माहितीनुसार, या नऊही मृतांवर मंगळवारी सकाळी ९ वाजता किट्टी येथील नर्मदा घाटावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना एकाच वेळी अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने संपूर्ण परिसरात शोकमग्न वातावरण आहे.