सडक अर्जुनी
encroachment स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कार करायचा कुठे असा प्रश्न सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील नागरिकांना पडला असून बुध्वारी १२ ऑगस्ट रोजी जागेअभावी मृतदेह दोन तास रस्त्यावर ठेवण्याची वेळ ग्रामस्थंवर आली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पळसगाव येथील शांताबाई बिशन बनसोड यांचे ११ ऑगस्ट रोजी निधन झाले. १२ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला असता, स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ३८१/२ मधील स्मशानभूमीच्या जागेवर गोवर्धन शेंडे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर ठेवावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तसेच नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रशासनाच्या उपस्थितीत शेतातील जागेत मृतदेहावर दफनविधी करण्यात आली.
स्मशानभूमीसाठी शासनाने निश्चित केलेल्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.