मानोरा,
Vegetable Kantola पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील रानभाज्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. त्यामध्ये कंटोला अर्थात कर्कोटकी, कर्टुले या रानभाजीला नागरिकांकडून विशेष पसंती मिळत आहे. हिरव्या रंगाची, काटेरी साल असलेली ही भाजी ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने केली जाते.'
कंटोल्याची भाजी चविष्ट असल्याने पावसाळ्यात तिची मागणी वाढते. ग्रामीण भागातील नागरिक जंगल, शेताच्या बांधावर किंवा उपलब्ध ठिकाणाहून कंटोला गोळा करून स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्ये कंटोला बाजारपेठही उपलब्ध असल्याचे दिसून येते. सध्या बाजारात कंटोल्यास ४०० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. पावसाळ्यात बाजारात विविध रानभाज्यांची रेलचेल पाहायला मिळत असून, कंटोला आला अन् पावसाळा खुलला अशी भावना ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. योग्य ओळख असलेली आणि सुरक्षितरित्या उपलब्ध झालेली भाजीच खरेदी करून सेवन करण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत आहे. कंटोला ही पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. याला कर्कोटकी, ककोरा असेही म्हणतात. यात प्रथिने, लोह आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते.