इस्लामाबाद,
hocking statement by former Pakistani minister पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांचा एक व्हिडिओ समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लश्कर-ए-तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींसोबत सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रशीद यांनी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याची उघडपणे प्रशंसा केली. याच कार्यक्रमातून त्यांनी भारताविरोधातही आक्षेपार्ह आणि धमकीवजा वक्तव्ये केली.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेख रशीद यांनी हाफिज सईदविषयी बोलताना, "मी हाफिज साहेबांचा गुलाम आहे," असे म्हटल्याचे दिसते. अमेरिकेतील वास्तव्यासंदर्भातही त्यांनी दावा केला. आपण अमेरिकेत असताना हाफिज सईद यांचा फोन आल्याचे आणि त्यानंतर आपल्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आल्याचे रशीद यांनी सांगितले.
भारताविरोधातील वक्तव्य करताना रशीद यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरली. भारताने पाकिस्तानकडे "नुसती नजर टाकली तरी" अल्लाह त्याचा नाश करेल, असा दावा त्यांनी केला. तसेच भारतातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी, "भारतात एकही पक्षी किलबिलाट करणार नाही, ना मंदिराच्या घंटा वाजतील," असे वक्तव्य केल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. याशिवाय पाकिस्तान आणि हाफिज सईदसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात रशीद यांच्यासोबत खालिद मसूद संधू आणि कारी मुहम्मद याकूब शेख हेही व्यासपीठावर उपस्थित होते. खालिद मसूद संधू यांची ओळख लश्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर तसेच पाकिस्तान सेंट्रल मुस्लिम लीगचा अध्यक्ष म्हणून झाली आहे. तर कारी मुहम्मद याकूब शेख हा लश्कर-ए-तोयबाच्या केंद्रीय सल्लागार समितीचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेख रशीद अहमद यांनी २०२० ते २०२२ या काळात इम्रान खान यांच्या सरकारमध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते अवामी मुस्लिम लीगचे संस्थापक आणि नेते आहेत. सध्या इम्रान खान अदियाला तुरुंगात असून त्यांच्यावर सरकारी भेटवस्तूंशी संबंधित भ्रष्टाचार, लँड ट्रस्टशी निगडित लाचखोरीचे आरोप आणि नागरी अशांततेशी संबंधित प्रकरणांसह अनेक खटले सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध यापूर्वीपासूनच तणावपूर्ण आहेत. काश्मीरमधील काही भागावर पाकिस्तानचा ताबा, सीमापार दहशतवाद आणि इतर अनेक मुद्द्यांमुळे दोन्ही देशांमध्ये सातत्याने तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्याने दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या उपस्थितीत भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.