नागपूर
uday samant महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नागपूरहून गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे दौऱ्यासाठी जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरने टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर पुन्हा सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
उद्योगमंत्री उदय सामंत हे नागपूरहून हेलिकॉप्टरने सूरजागडच्या दौऱ्यावर निघाले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. कोणताही धोका न पत्करता पायलटने तातडीने हेलिकॉप्टर परत उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
या हेलिकॉप्टरमध्ये उदय सामंत यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत उदय सामंत यांच्यासह सर्वजण सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही. पायलटच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे मानले जात आहे.दरम्यान, व्हीआयपी आणि राजकीय नेत्यांच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टर किंवा विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर व्हीआयपींच्या हवाई प्रवासातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणानंतर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.