दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या निवासी भागात हवाई हल्ले चढवत ३२ नागरिकांचा जीव घेतला, याचा सूड म्हणून शुक्रवारी लष्कराला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती युनायटेड बलुच आर्मीचे (यूबीए) प्रवक्ते मजार बलुच यांनी एका निवेदनातून दिली. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. लढाऊ गटांनी बलुचिस्तानच्या बोलान भागातील दराझ बीट येथील पाकिस्तानी लष्करी चौकी स्फोटकांनी उडवली. या हल्ल्यात १४ सैनिक ठार झाले, तर ३५ जखमी आहे. यूबीएचे लढाऊ गट दराझ बीट आणि पंजरा ब्रिज चौकी दरम्यानच्या लष्करी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि परिसरातील ताफा व जवानांच्या हालचालींची माहिती गोळा करत होते. शोधमोहिमेसाठा ताफा रवाना होताच चौकीवर हल्ला चढवला. याशिवाय बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यातील छत्तरजवळ आणि सिंध प्रांतात वीज प्रकल्पात आत्मघाती स्फोट घडवण्यात आले. यात यूबीएचे दोन लढवय्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून, वीजनिर्मितीचे काम बंद करण्यात आले.
लष्कराकडून अमानवीय अत्याचार
यूबीएच्या प्रवक्त्याने आरोप केला की, बुधवारी बलुचिस्तानच्या सुरब जिल्ह्यातील गिदार भागात पाकिस्तानी हवाई हल्ल्यात मुले आणि महिलांसह ३२ लोकांचा बळी गेला आणि ५० पेक्षा जास्त जखमी आहे. हा हल्ला आणि निष्पाप मुलांचा मृत्यू हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि जीनिव्हा कराराचे उल्लंघन आहे. युरोपियन युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी बलुचिस्तानमधील अमानवीय अत्याचार आणि मानवतावादी संकटावर तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.