नवी दिल्ली,
Dimagi Naxal party on Instagram सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘दिमागी नक्षल पार्टी’ या नावाने तयार करण्यात आलेले एक अकाऊंट सध्या चर्चेत आले आहे. हे अकाऊंट सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याला १.७ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे अकाऊंट नेमके कोण चालवत आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, हे अकाऊंट याच महिन्यात तयार करण्यात आले आहे. उपलब्ध नोंदीनुसार, या अकाऊंटचा वापरकर्ता नाव एकदा बदलण्यात आला आहे. आतापर्यंत या खात्यावर ६३ पोस्ट करण्यात आल्या असून, हे अकाऊंट सुमारे ३५ जणांना फॉलो करते. मात्र, अकाऊंटच्या मागे असलेल्या व्यक्ती किंवा समूहाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

‘दिमागी नक्षल पार्टी’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर विशेष चर्चेत आले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सशस्त्र नक्षलवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख केला. जंगलांमध्ये शस्त्रे हाती घेणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात कारवाई झाली असली, तरी विचारांच्या माध्यमातून नक्षलवादाला पाठिंबा देणाऱ्या घटकांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान मोदी यांनी अशा विचासरणीच्या लोकांकडून हिंसाचाराचा मार्ग पुन्हा शोधण्याचा आणि देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा इशारा दिला. त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर ‘दिमागी नक्षल पार्टी’ या नावाचे अकाऊंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर याच नावाने एकापेक्षा अधिक अकाऊंट्सही दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही ‘विचारशून्य नक्षलवादी’ या संज्ञेचा संदर्भ स्पष्ट करताना काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, ही संज्ञा माओवाद्यांना समर्थन देणाऱ्या, भारतीय संविधानाचा आदर न करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० च्या समर्थनासह ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे करण्याच्या कथित कटाचाही त्यांनी उल्लेख केला. दरम्यान, ‘दिमागी नक्षल पार्टी’ नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट नेमके कोण चालवत आहे, त्यामागील उद्देश काय आहे आणि अवघ्या एका दिवसात त्याला १.७ लाखांहून अधिक फॉलोअर्स कसे मिळाले, याबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या अकाऊंटची सत्यता, त्यामागील व्यक्ती किंवा संघटना आणि त्याच्या कारभाराबाबत पुढील काळात काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.