हिंगणघाट
Hinganghat Acciden स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी शहरात झालेल्या भीषण अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. या हृदयद्रावक घटनेने नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत असताना खासदार अमर काळे आणि राकाँ शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मिसबा जावेद शेख (१७), समृद्धी रूपक धामसे (१६) आणि आरोही अनुप चवरे (१६) या तीन जिवलग मैत्रिणींचा या अपघातात मृत्यू झाला. अत्यंत कमी वयात तिन्ही मुलींचा झालेला मृत्यू हा कुटुंबीयांसाठी मोठा आघात असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे आणि जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मृत विद्यार्थिनींच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करीत कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तिन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी मृत विद्यार्थिनींना श्रद्धांजली अर्पण केली.