पाटणा,
14 ias officers transferred in bihar बिहारमधील प्रशासनात मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेल्या आदेशात तब्बल १४ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त विभागांची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये महत्त्वाच्या विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त तसेच पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रशासकीय यंत्रणेत कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. १९९५ बॅचचे आयएएस अधिकारी अरविंद कुमार चौधरी, जे अपर मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिवालयाच्या जबाबदारीवर आहेत, त्यांच्याकडे पाटणा येथील विपार्ड अर्थात BIPARD चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. १९९६ बॅचचे आयएएस अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांची ग्रामीण विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागातील चौकशी आयुक्तपदाचाही अतिरिक्त प्रभार राहणार आहे.
राजेश कुमार यांची पाटणा विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनय कुमार यांच्याकडे वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मयंक बडवडे यांची निगराणी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री सचिव संजय सिंह यांच्याकडे उत्पादन, मद्यनिषेध आणि नोंदणी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाचे सचिव चंद्रशेखर सिंह यांच्याकडे लघु जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नवदीप शुक्ला यांच्याकडे बिहार शिक्षण प्रकल्प परिषदेच्या संचालकपदाची, विनोद सिंह गुंजियाल यांच्याकडे समाजकल्याण विभागाची, तर उच्च शिक्षण सचिव रौशन यांच्याकडे शिक्षण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
या फेरबदलात राज्यातील पाच जिल्ह्यांनाही नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. सिवानच्या जिल्हाधिकारीपदी नगरविकास विभागाचे अपर सचिव विजय प्रकाश मीणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोजपूरची जबाबदारी खाण संचालक मनेश कुमार मीणा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रिची पांडेय यांची बेगूसरायच्या जिल्हाधिकारीपदी, तनय सुल्तानिया यांची सीतामढीच्या जिल्हाधिकारीपदी आणि अनुराग कुमार यांची कैमूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय कार्तिकेय धनजी यांच्याकडे पीएचडी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन कुमार यांना मद्यनिषेध विभागाच्या अतिरिक्त पदभारातून, तर विनोद सिंह गुंजियाल यांना शिक्षण विभागाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
मध्यरात्री जाहीर झालेल्या या प्रशासकीय फेरबदलामुळे बिहारच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या आणि अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे राज्यातील विविध विभाग तसेच जिल्ह्यांच्या कारभाराला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.