मुंबई
Shah Rukh Khan’s Mannat बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’ बंगल्यात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दोन साप आढळल्याने खळबळ उडाली. सापांची जोडी दिसताच बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि एका सापाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. मात्र, दुसरा साप अद्याप सापडलेला नसल्याने मन्नतमधील स्टाफमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नंतर बंगल्याच्या बागेतील एका शेडखाली अडकलेला साप आढळून आला. हा साप सुमारे आठ फूट लांब होता. त्याची ओळख बिनविषारी साप म्हणून करण्यात आली आणि कोणतीही इजा न करता त्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले. मात्र, मन्नतच्या परिसरात सुरू असलेल्या लोकांच्या सततच्या वर्दळीमुळे दुसरा साप पळून जाण्यात यशस्वी झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बराच वेळ दुसऱ्या सापाचा शोध घेतला. एका सापाची सुरक्षित सुटका झाल्यानंतर त्याला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, बेपत्ता असलेला दुसरा साप बंगला सोडून बाहेर निघून गेला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
साप पकडणाऱ्या झुबेर शाह यांनी या घटनेबाबत सांगितले, ‘आज, १७.०८.२०२६ रोजी, मी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्या घर ‘मन्नत’मधून एक साप वाचवला. येथे एक स्पेक्टेकल्ड कोब्रा (नाग) पकडण्यात आला. त्या सापाला सुरक्षितपणे वाचवून पुन्हा निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आले आहे.’
दरम्यान, मन्नत बंगल्यात सध्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासह वांद्रे येथील दुसऱ्या फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मन्नतमध्ये आणखी दोन मजले वाढविण्याचे काम सुरू आहे. या नूतनीकरणाला विरोध करत मुंबईतील एका रहिवाशाने याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ठोस आधार आढळून न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आणि त्यानंतर मन्नतच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. आता बंगल्यातील या कामाच्या काळात सापांची जोडी आढळल्याने स्टाफची चिंता वाढली असून, बेपत्ता सापाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.