मुंबई,
A major responsibility rests on Tilak Varma. भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याच्यावर बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेसाठी त्याची दक्षिण विभागाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशचा रिकी भुई याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.अलीकडच्या काळात तिलक वर्माने भारतीय टी-२० संघात सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले स्थान मजबूत केले आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता दुलीप ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याला नेतृत्वाची संधी देण्यात आल्याने बीसीसीआयचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. क्रिकेट वर्तुळात भविष्यातील नेतृत्वासाठी तिलक वर्माची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
दक्षिण विभागाच्या संघात अनुभवी फलंदाज करुण नायर यालाही स्थान देण्यात आले आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या नायरला गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर तब्बल आठ वर्षांनंतर संधी मिळाली होती. मात्र चार कसोटी सामन्यांत एकच अर्धशतक झळकवल्यानंतर त्याला पुन्हा संघाबाहेर जावे लागले. आता दुलीप ट्रॉफीत दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघाचे दरवाजे पुन्हा ठोठावण्याचा त्याचा प्रयत्न असेल.संघात अनुभवी यष्टिरक्षक एन. जगदीसनचाही समावेश करण्यात आला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीचा समतोल असलेला दक्षिण विभागाचा संघ यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
गतवर्षी अंतिम फेरी गाठल्यामुळे दक्षिण विभागाला यंदा थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. ३० ऑगस्ट रोजी दक्षिण विभागाचा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. गतविजेता मध्य विभागालाही थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले असून, त्या संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे.दुलीप ट्रॉफी २०२६साठी दक्षिण विभागाच्या संघात तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराना, एस. के. रशीद, के. हिमातेजा, आर. स्मरन, एन. जगदीसन, करुण नायर, टी. त्यागराजन, श्रेयस गोपाल, के. साई तेजा, टी. विजय, व्ही. कावेरप्पा आणि अमन खान यांचा समावेश करण्यात आला आहे.