parental-interference-daughters-marriage कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शिक्षण संपताच कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला. दोन अपत्य होईपर्यंतच्या मुलीच्या सुरळीत संसारात आई-वडिलांनी विघ्न घातले आणि मुलीचा संसार तुटण्याच्या काठावर आला. पती दोन्ही मुलींना डोळेभरून बघण्यासाठी तासन्तास उभा असतो तर अहंकाराने व्याप्त पत्नीने विभक्त होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

पूनमच्या आई-वडिलांचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप वाढला. पती-पत्नीने पुण्यात फ्लॅट घेण्याचे ठरविले तर आईने पूनमच्या नावावर फ्लॅट घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर राजेशच्या आई-वडिलांना पुण्यात येऊ नये अशी अट घातली. पूनमच्या भावाचा आणि वहिनीचाही हस्तक्षेप संसारात वाढला. आईवडील पुण्यात आले आणि पूनमला माहेरी नागपुरात आणले. त्यानंतर फ्लॅटमध्ये कर्ज काढून फर्निचर करायला सांगितले. हे सर्व झाल्यानंतर पूनमला परत पाठविणार नाही, असा निरोप दिला.
parental-interference-daughters-marriage हतबल पतीची न्यायासाठी धडपड
दोन्ही मुलींसह माहेरी आलेल्या पूनमने थेट भेटण्यास नकार दिला. त्यानंतर घटस्फोटाची मागणी केली. या निर्णयाने राजेश अचंभित झाला. ती मुलींनाही भेटू देत नव्हती. हतबल झालेल्या राजेशने सुरुवातीला भरोसा सेलमध्ये धाव घेतली. तेथे समुपदेशनानंतरही ती पतीकडे परत जायला तयार होत नव्हती. शेवटी मुलीच्या भेटीसाठी राजेशला न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्याने मुलींच्या प्रेमापोटी पुण्यातील नोकरी सोडून नागपुरात जेमतेम पगाराची नोकरी स्वीकारली. सासऱ्याच्या घरासमोर भाड्याने खोली घेऊन राहायला लागला. अजूनही तो मुली आणि पत्नी परत यावी, यासाठी धडपड करीत आहे. अशाप्रकारे फक्त माहेरच्यांच्या हस्तक्षेपामुळे मुलीच्या संसाराचे ‘तीन तेरा’ वाजले.