मुंबई
ganesh naik शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी थेट लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देत मागणी केली होती. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या स्वतंत्र गटाला मंजुरी दिल्यानंतर या सहाही खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा असून, या विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला काही मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदारांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा होत आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून राज्यभरात ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची चर्चा आहे. काही आमदारही शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्लस्टरच्या माध्यमातून ३० वर्षे पूर्ण न झालेल्या, पडझडीला आलेल्या नसलेल्या तसेच अतिधोकादायक घोषित न झालेल्या इमारतींमध्येही क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला.
युडिसीपीआरबाबतही गणेश ganesh naik नाईक यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. “युडिसीपीआर कुठल्या शहाण्याने आणला?” असा सवाल त्यांनी केला होता. नव्या युडिसीपीआरनुसार नवी मुंबईतील सर्व इमारतींचा एफएसआय वाढल्यास नवी मुंबईत जगण्यासारखे काही राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.यासोबतच गणेश नाईक यांनी या मुद्द्यावरून थेट इशाराही दिला. “गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. हा इशारा त्यांनी कोणाचेही नाव न घेता दिला असला तरी त्यांचा रोख थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.क्लस्टर योजना आणि युडिसीपीआरच्या मुद्द्यावरून आता शिंदे आणि नाईक यांच्यातील मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर शिंदे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असून, राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.