पावसाचा केरळ, गुजरात, आसाममध्ये हाहाकार; सहा ठार

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Havoc in Assam; six dead. देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनने जोर पकडला असून केरळ, गुजरात आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. केरळमध्ये पावसाचा मोठा फटका बसला असून पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये ६५ मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून, या शिबिरांमध्ये १,४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.
 

asam 
 
मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून भूस्खलनाचा धोका कायम आहे. याच पार्श्वभूमीवर त्रावणकोर देवस्वम बोर्ड आणि पथानामथिट्टा जिल्हा प्रशासनाने २ आणि ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निरपुत्री उत्सवासाठी शबरीमला येथे जाणाऱ्या भाविकांना विशेष सूचना दिल्या आहेत. भाविकांनी प्रवास करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केरळमधील पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, पालक्काड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या १२ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने सतर्कता वाढवली असून अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांकडून पूरग्रस्त भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे.हवामान विभागाने गुजरातमधील अहमदाबाद, सुरेंद्रनगर, राजकोट, भावनगर, मोरबी आणि बोटाद जिल्ह्यांसाठी रविवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. शनिवारी दक्षिण आणि मध्य गुजरातमधील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सुरत आणि नवसारीसह विविध भागांमधून सुमारे २७,००० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
 
आसाममध्ये पूरस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी संकट कायम आहे. राज्यातील पूरग्रस्तांची संख्या १,७८,००० पर्यंत कमी झाली आहे, मात्र पूरबाधित जिल्ह्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यातील पूरामुळे मृतांचा एकूण आकडा ८२ वर कायम आहे.आसाममधील शिवसागर आणि गोलाघाट जिल्ह्यातील नद्या अजूनही धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. गोलाघाट, शिवसागर, चराईदेव, बाजाली, धेमाजी, सोनितपूर आणि जोरहाट हे जिल्हे पूरग्रस्त आहेत. सध्या २१८ मदत शिबिरांमध्ये ७१,८८९ नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच १,८११ मदत वितरण केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. तीन राज्यांतील पावसाच्या परिस्थितीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे लक्ष असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.