तिरुवनंतपुरम,
Rains Wreak Havoc in Kerala केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण अद्याप बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी महसूल मंत्री आणि इतर मंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवत परिस्थितीचा आढावा घेतला असून, विविध जिल्ह्यांतील प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य वेगाने राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागांतील आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६ जणांच्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली असून ६ जणांचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध बचाव पथके संयुक्तपणे शोधमोहीम राबवत आहेत.

पूरग्रस्तांसाठी राज्यभरात ६५ मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये १,४६५ जणांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे. गरज पडल्यास आणखी नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या आपत्तीत १७ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून १२७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. दिवसभर जोरदार पाऊस झालेल्या काही भागांत संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बचावकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त बोटी मागवण्यात आल्या आहेत. विविध धरणांतील पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून डोंगराळ आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, कोझिकोड जिल्ह्यातील अनाक्कम्पोयिल येथे गेल्या ३५ तासांत ३४० मिमी पावसाची नोंद झाली, तर वायनाड जिल्ह्यातील मेप्पडी येथे १७७ मिमी पाऊस झाला. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगण्यात आले असून, नागरिकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी केले आहे.