सिक्किम,
trade resumes via Nathu La Pass कोविड-१९ महामारी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर २०२० पासून बंद असलेला भारत-चीन सीमा व्यापार अखेर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी नाथुला खिंडीतून या व्यापाराला अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील व्यापार, उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेला मोठी चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया सिक्किमचे वाणिज्य व उद्योग मंत्री टी. टी. भुटिया यांनी व्यक्त केली.भुटिया यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सिक्किममार्गे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. आता सीमा व्यापार पुन्हा सुरू झाल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक देवाणघेवाणीलाही नवी गती मिळेल.

सिक्किममधील हस्तकला, हातमाग उत्पादने आणि सेंद्रिय शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या व्यापाराचा फायदा स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सध्या व्यापारासाठी मंजूर असलेल्या ३६ वस्तूंच्या यादीत बदल करण्याची मागणी केली आहे. पारंपरिक वस्तूंऐवजी औद्योगिक उत्पादनांचा समावेश करण्यात यावा, तसेच घोडे आणि शेळ्या यांसारख्या जुन्या वस्तूंच्या जागी आधुनिक व्यापाराला चालना देणाऱ्या वस्तूंना परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
याशिवाय, सध्या लागू असलेली प्रतिदिन २ लाख रुपयांची व्यापार मर्यादा वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि चलनमूल्याचा विचार करून ही मर्यादा वाढवावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.नाथुला मार्गावरील व्यापारासाठी आतापर्यंत सुमारे ५०० व्यापाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३०० व्यापाऱ्यांची कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना लवकरच परवानगीपत्रे दिली जाणार आहेत. पुढील दोन आठवड्यांत व्यापार पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटांहून अधिक उंचीवर असलेली नाथुला खिंड ही भारत आणि चीनला जोडणाऱ्या ऐतिहासिक रेशीम मार्गाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक सीमा व्यापाराचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले.