तभा वृत्तसेवा
ढाणकी,
painganga river bridge at ganjegaon तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाला जोडणाèया महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच उमरखेड-ढाणकी-हिमायतनगर बस सेवाही बंद करण्यात आली आहे.
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्यावर गेली आहे. यामुळे ढाणकी ते हिमायतनगर या राज्य मार्गावरील गांजेगाव पुलावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करावी, असे सांगण्यात आले आहे. पुलावर पाणी आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड-ढाणकी-गांजेगाव-हिमायतनगर मार्गावरील सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व रुग्णांना बसला आहे. पर्यायी मार्गाने जाण्यासाठी प्रवाशांना सुमारे 25 ते 30 किमीचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वेळ व इंधनाचा मोठा खर्च वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षांपासून दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. 2 ते 3 महिने हा भाग संपर्कापासून तुटतो. त्यामुळे या भागातील व्यापारी, शेतकरी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.
याविरोधात ढाणकी, गांजेगाव, हिमायतनगर येथील नागरिकांनी एकत्र येत नवीन उंच पूल बांधण्याची मागणी लावून धरली आहे. सध्याच्या पुलापेक्षा 10-12 फूट उंचीचा नवीन पूल तातडीने मंजूर करावा. यासाठी विशेष निधी उपलब्ध करून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. लहान पूल बांधून दरवर्षी दुरुस्ती करण्यापेक्षा एकदाच उंच व भक्कम पूल बांधा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.