नागपूर,
saptarangi indradhanu सुरेखा बोरकर यांच्या ‘सप्तरंगी इंद्रधनू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य कला सेवा मंडळाच्या ५६व्या वर्धापनदिन सोहळ्यात भाऊसाहेब शेवाळकर सभागृह, नागपूर येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय जनस्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजेश काकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर, साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आशा पांडे, दैनिक दिव्य वतनचे संपादक गोपाल कडूकर, विशेष अतिथी डॉ. देविदास इंदापवार, ‘ब्लर्बकार’ प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, विडंबनकार दादासाहेब सादोडकर, संस्थेचे अध्यक्ष कुबडे, उपाध्यक्ष रमेश बेलगेआणि कवयित्रीसुरे खा बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सप्तरंगी इंद्रधनू’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्ष राजेश काकडे म्हणाले, “साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते.

समाजाला दिशा देणे हे साहित्यिकाचे कर्तव्य असते. कवयित्री सुरेखा बोरकर यांच्या कवितेत माणसाचे जगणे समजून घेण्याची पात्रता आहे.” प्रमुख अतिथी डॉ. शरद निंबाळकर यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करताना, “या काव्यसंग्रहाने काळाचे, संस्कृतीचे आणि समाजाचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे,” असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही कवयित्री सुरेखा बोरकर यांच्या काव्यलेखनावर भाष्य करून त्यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बोकाडे यांनी केले. प्रणाली डहाट यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन हर्षा कोठेकर यांनी केले, तर आभार राजेश माहूरकर यांनी मानले.
सौजन्य: निकेता गावंडे, संपर्क मित्र