नवी दिल्ली,
India to import sugar from abroad सणासुदीच्या काळात महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली असून किरकोळ बाजारात दर ४८ ते ५० रुपये प्रति किलो, तर कोल्हापूर घाऊक बाजारात ५,३५० रुपये प्रति क्विंटल या विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत आयातीवरील शुल्क तात्पुरते हटवले आहे.

यापूर्वी आयात केलेली साखर निर्यात करण्याची अट रिफायनरींवर होती; मात्र आता ही संपूर्ण साखर थेट देशांतर्गत बाजारातच उपलब्ध करून दिली जाणार आहे. advance authorization असलेल्या कंपन्यांना TRQ मध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय मिळेल, पण यासाठी त्यांना जीएसटी सूट भरावी लागेल आणि ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही साखर फक्त देशातच विकावी लागेल. या कोट्याचे वितरण आणि अर्जाची प्रक्रिया डीजीएफटी लवकरच जाहीर करेल. भारत हा जगातील दुसरा मोठा साखर उत्पादक आणि सर्वात मोठा ग्राहक देश आहे. ही आयात पार पडल्यास, तब्बल १० वर्षांनंतर भारत पहिल्यांदाच परदेशातून साखर आयात करेल.