‘सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानला इराणची मदत?

पाककडूनच मोठा दावा

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Iran's assistance to Pakistan during Sindoor भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान इराणने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी केला आहे. मात्र, इराण किंवा पाकिस्तानकडून या दाव्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे इराणने पाकिस्तानला नेमका कोणत्या स्वरूपाचा पाठिंबा दिला होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. याच काळात इशाक दार यांनी पाकिस्तान आणि इराणमधील संबंधांवर भाष्य करताना भारतासोबतच्या मे २०२५ मधील संघर्षाचा उल्लेख केला. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तान आणि इराणमधील संबंध सुधारल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
sd435456
 
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानमधील अनेक लढाऊ विमाने, रडार यंत्रणा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले. वृत्तानुसार, इशाक दार यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, जून २०२५ मध्ये झालेल्या १२ दिवसांच्या युद्धादरम्यान तसेच अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या सध्याच्या संघर्षात पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे मे २०२५ मध्ये भारतासोबत झालेल्या संघर्षाच्या वेळी इराणने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांनी केला.
 
 
इशाक दार यांनी केलेल्या या दाव्यात ‘पाठिंबा’ नेमका कोणत्या स्वरूपाचा होता, याचे स्पष्टीकरण मात्र देण्यात आलेले नाही. या दाव्याला इराण किंवा पाकिस्तानकडून स्वतंत्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान आणि इराण यांच्यातील संबंधांच्या संदर्भात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.भारताविरोधातील संघर्षादरम्यान इराणने दिलेल्या कथित पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी इशाक दार यांनी मे २०२५ मध्ये इराणचा दौरा केल्याचेही वृत्त आहे. मात्र, या भेटीदरम्यान नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या सहकार्याबाबत चर्चा झाली होती, याची माहिती समोर आलेली नाही.
 
 
दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी डिस्कव्हरीच्या आगामी ‘ऑपरेशन सिंदूर डिक्लासिफाइड’ या मालिकेत या मोहिमेबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ८८ तास चाललेल्या या कारवाईचा प्रमुख उद्देश शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करणे हा होता. विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानच्या या नव्या दाव्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळातील इराणची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र, इराणकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर येईपर्यंत पाकिस्तानने केलेल्या दाव्याची नेमकी व्याप्ती स्पष्ट होणार नाही.