मुंबई,
reserve bank of india सध्याच्या जागतिक आव्हानांना तोंड देताना अर्थव्यवस्थेने उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे. ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशांतर्गत मागणीतील उत्साह आणि उत्पादन व सेवा क्षेत्रातील वाढती उलाढाल असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने ताज्या बुलेटिनमध्ये मंगळवारी म्हटले आहे.

जुलैमध्ये नैऋत्य मान्सूनमध्ये झालेल्या सुधारणेमुळे खरीप पिकांची पेरणी सामान्य क्षेत्राजवळ पोहोचण्यास मदत झाली, ज्यामुळे कृषी क्षेत्रापुढील काही धोके अंशतः कमी झाले. तथापि, पश्चिम आशियातील भू-राजकीय संघर्ष आणि अमेरिकेने लादलेले नवीन शुल्क, यांमुळे जागतिक आर्थिक दृष्टिकोन अजूनही प्रभावित होत आहे, असे ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ यावरील लेखात म्हटले आहे. २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील गती जुलैमध्येही कायम राहिली, ज्यात बहुतेक उच्च-वारंवारता निर्देशकांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उलाढाल, तसेच वस्तूंच्या निर्यात आणि आयातीत दुहेरी अंकी वाढ दर्शवली, असे त्यात म्हटले आहे. मुख्य ग्राहक किंमत निर्देशांक महागाई लक्ष्याच्या वर गेली असली, तरी ते प्रामुख्याने पुरवठ्यावरील दबावामुळे होते. स्थिर मूळ महागाईने खर्चाच्या दबावाचा कमी भार ग्राहकांवर पडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.