मुंबई
jaggery price hike सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत गोडधोड पदार्थांची तयारी सुरू असतानाच साखरेपाठोपाठ गुळाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांसह गुळावर आधारित उद्योगांचीही चिंता वाढवली आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या किरकोळ दरात लक्षणीय वाढ झाल्यानंतर आता गुळाचे भावही वाढले असून, गुळाचा दर ७० ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम गुळावर आधारित उद्योगांवर होत आहे.
गुळाचे दर निश्चित नसल्याने उद्योजकांना उत्पादन खर्चाचा अंदाज बांधणे कठीण जात आहे. वाढत्या दरामुळे अनेक उद्योजकांनी नवीन ऑर्डर घेणे थांबवले असून, सध्या केवळ जुन्या ऑर्डर्सचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या दराने मालाची ऑर्डर स्वीकारणे परवडत नसल्याने उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
“गुळाचे दर वाढल्यामुळे आम्ही कोणत्याही नवीन ऑर्डर घेत नाही. सध्या जुन्या ऑर्डर्सचेच काम करत आहोत. वाढत्या भावामुळे नवीन ऑर्डर घेणे आम्हाला परवडणार नाही. नवीन दराने मालाची ऑर्डर घेणे शक्य नाही. राज्य सरकारने गुळाचे दर नियंत्रणात आणले नाहीत, तर आम्हाला उद्योगधंदे बंद करण्याची वेळ येईल,” अशी माहिती उद्योजक अनिल सावंत यांनी दिली.
गुळाच्या वाढत्या दरावर सरकारने jaggery price hike नियंत्रण आणावे, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. सणासुदीच्या काळात गोडधोड पदार्थांची मागणी वाढत असताना कच्च्या मालाच्या दरवाढीचा फटका उद्योगांना बसत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतला आहे.