अल्लीपूर,
gram sabha स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट नंतर होणार्या सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसभा या आता ग्रामपंचायत मधील नियमित कर्मचारी, ग्रामसेवक, सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्या गैरहजेरीत होणार असल्याचे दिसून येत आहे. जळगाव येथील ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटयाने ग्रामसभेदरम्यान मृत्यू झाल्याने त्या विरोधात ग्राम सचिवांनी व त्यांच्या संघटनेने निर्णय घेतल्यानुसार आता पुढील ग्रामसभांना आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याची माहिती शासनाला दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मधील सर्व कारभार हा ग्रामसेवक किंवा सचिव पहात असल्याने व ग्रामपंचायतीत इंत्यंभूत माहिती सुद्धा ग्रामसेवकालाच आहे.

परंतु, त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतल्याने आता सरपंच, त्या गावातील मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. तेच तंटामुती अध्यक्ष अहवाल वाचन, रोजगार सेवकाची नियुती, घरकुल मंजुरी व इतर गावातील सुविधांच्या माहितीचे वाचन करतील. अशाच ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणार आहेत. गावातील राजकारण, आपसी तंटे व इतर ग्राम समस्या घेऊन सर्व जनता आपली गार्हाणे ग्रामसभेत मांडत असतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे ते ग्रामसेवकच सभेला गैरहजर राहणार असल्याने हे गार्हाणे शिक्षक किंवा मुख्याध्यापक ऐकूण काय करणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. सध्या अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंच, उपसरपंच व सदस्य विराजमान आहेत. मात्र, त्यांनाही अधिकार नसल्याने तसेच ग्रामपंचायतचा अधिकारीच सभेला नसल्याने या सभेला किती महत्त्व राहील, हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.