मुंबई
MPSC Paper Leak Case महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान, या पेपरफुटीमागे एका प्रेमसंबंधातील कटुतेचा धक्कादायक पदरही तपासातून समोर आला आहे.
गुन्हे शाखेच्या तपासानुसार, लोकेश ऊर्फ गौरव पाटील (२४) याला २२ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी त्याची प्रेयसी ऋतुजाकडून प्रश्नपत्रिका मिळाली होती. ऋतुजाचे वडील अमृत पाटील (५५) यांनी परीक्षेपूर्वी नंदुरबारमधील मध्यस्थ प्रवीण पाटील (४०) यांच्याशी संपर्क साधला होता. प्रवीण पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर नकाते (३५), अवर सचिव अभिजीत लेंढवे आणि सहायक विभाग अधिकारी गोपाळ मराठे (३७) यांनी प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या तिघांसह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण पाटील यांनी आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये दिले होते आणि त्यानंतर आणखी रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते.
प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर अमृत पाटील यांनी परीक्षेच्या काही दिवस आधी ती आपली मुलगी ऋतुजाला दिली. ऋतुजाने परीक्षेच्या दोन दिवस आधी हा प्रश्नपत्रिका गौरवलाही संदेशाद्वारे पाठवला होता. गौरवचा भाऊदेखील ही परीक्षा देणार होता. परीक्षेच्या निकालात ऋतुजाने सातवा क्रमांक मिळवला. मात्र, निकाल जाहीर होईपर्यंत गौरव आणि ऋतुजाचे संबंध संपुष्टात आले होते.
यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. ऋतुजाला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर ती आपल्याला विसरून पुढे जाईल, अशी भीती गौरवला वाटत होती, असा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली. सुरुवातीला तो या प्रकरणातील माहिती देणारा व्यक्ती असल्याचे समोर आले होते. मात्र, तपास पुढे सरकल्यानंतर तो स्वतःच प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सांगितले.
गौरवने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका उमेदवाराचा मित्र असल्याचे सांगत आयोगाला ईमेल केला होता. त्यात २२ मार्च रोजी झालेली परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आयोगाने या तक्रारीची चौकशी सुरू केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जुलैमध्ये या प्रकरणाचा स्वतंत्रपणे पाठपुरावा सुरू केला. नंदुरबारमधील एका शिकवणी संस्थेतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिकेतील बहुतेक प्रश्न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता.आयोगाने मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने तपास हाती घेतला. तपास सुरू असताना पोलिसांचा संशय आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचे गौरवच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पुन्हा आयोगाशी संपर्क साधून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत आपला गैरसमज झाल्याचे सांगत तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेने तपास सुरूच ठेवला. त्यात प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात फुटली होती आणि गौरवलाही परीक्षा होण्यापूर्वीच ती मिळाली होती, हे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गौरव खरोखरच माहिती देणारा व्यक्ती असता तर त्याने परीक्षा होण्यापूर्वीच आयोगाला सावध करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने परीक्षा झाल्यानंतर तक्रार केली.
दरम्यान, या प्रकरणात ऋतुजालाही नोटीस बजावण्यात आली आहे. तिला परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाली होती, असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठीची परीक्षा २२ मार्च रोजी राज्यातील सहा महसूल विभागांतील केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला तब्बल ४४ हजार ५०० उमेदवार बसले होते. १२ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यानंतर २२ जुलै रोजी ४८८ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.