नवी दिल्ली,
450 tonnes of onions from nashik to delhi कांद्याच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या दिल्लीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून तब्बल ४५० टन कांदा घेऊन निघालेली विशेष ‘कांदा एक्सप्रेस’ शुक्रवारी सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. राजधानीत वाढलेल्या कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी हा कांदा ग्राहकांना ३५ रुपये प्रति किलो या अनुदानित दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे.
लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक बाजारपेठ मानली जाते. येथून २१ डब्यांची विशेष मालगाडी कांदा भरून बुधवारी दुपारी ३:१० वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाली होती. दिल्लीतील बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले असून, देशातील काही शहरांमध्ये हाच दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
शहरी भागातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून दिल्लीला एकूण ८४० टन कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४५० टन कांदा विशेष रेल्वेने राजधानीत आणण्यात आला आहे. बाजारातील वाढलेल्या दराला पर्याय म्हणून हा कांदा अनुदानित किमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रितेश दुबे यांनी सांगितले की, ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून सुमारे ४५० टन कांदा दिल्लीला पाठवण्यात आला आहे. ही विशेष रेल्वे दिल्लीजवळील आदर्श नगर स्थानकावर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. कांद्याची वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ण करून तो नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचेही दुबे यांनी स्पष्ट केले.