राजगड,
Bus plunges off bridge in Rajgad. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियावरा शहरातील भोपाळ बायपासवर शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. उत्तर प्रदेशातील कानपूरहून इंदूरकडे जाणाऱ्या एका अतिवेगवान प्रवासी बसचे पुलावर वळण घेताना नियंत्रण सुटले आणि ती सरळ संरक्षक भिंतीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसमधील सुमारे चार प्रवासी ३० फूट उंच पुलावरून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर जाऊन कोसळले. या दुर्दैवी घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी बियावरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यापैकी ४ गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भोपाळला हलवण्यात आले आहे. एका आरोपीच्या शोधासाठी इंदूरकडे जात असलेले बंगळूरुचे सायबर पथकही या बसमध्ये प्रवास करत होते. या अपघातात मारल्या गेलेल्या ५ जणांमध्ये बंगळूरुच्या सायबर टीमचे इन्स्पेक्टर रवी के. व्ही. (वय ४५, रा. बंगळूरु, वडील: बसप्पा), बस चालक विकास शुक्ला, बेलाल अली (वडील: कलीमुल्ला मिया, रा. बिजवाड) आणि ज्योतिरादित सिंग गॉड (वडील: विक्रम सिंग गौर, रा. बिजवाड) यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एसपी) के. एल. बंजारे यांच्या माहितीनुसार, सायबर पथकातील सब-इन्स्पेक्टर रमेश नायक (वडील: पांडप्पा, रा. बंगळूरु), तांत्रिक कर्मचारी विश्वनाथ (वय ३९, वडील: मोहन, रा. सायबर सेल, बंगळूरु) आणि एएसआय श्रीनिवास (वय ५०, वडील: व्यंकटेश गिरी, रा. बंगळूरु) हे जखमी झाले असून एएसआय श्रीनिवास यांची प्रकृती गंभीर आहे.
उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी निघालेले उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मोहम्मदपूरचे रहिवासी अमित कुमार प्रताप सिंग, त्यांची पत्नी मीनू सिंग (वय ३७), मुलगा रक्षित सिंग (वय १३) आणि सासरे सुरेंद्र प्रताप सिंग (वय ६८, रा. हुरूरी, जि. जौनपूर) हे कुटुंबीयसुद्धा या अपघातात जखमी झाले आहेत. इतर जखमींमध्ये विनोद कुमार सिंग (वय ४०, रा. मोहम्मदपूर, जौनपूर), रवी शर्मा (वय ४२, वडील: दिनानाथ शर्मा, रा. कानपूर), पार्थ शर्मा (वय ८, वडील: रवी शर्मा), सुमन शर्मा (वय ३६, पती: रवी शर्मा, रा. कानपूर), केशव (वय २८, वडील: श्रीपाल, रा. मथुला, अलीगढ) आणि सोनू (वय ३९, वडील: हरी बाबू, रा. खैराबाद, सीतापूर) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार बसचा अतिवेग हेच या दुर्घटनेमागचे मुख्य कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.