विशेष मुलांच्या निरागस प्रेमाने राखीपौर्णिमा झाली अविस्मरणीय

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
मुंबई
sun marath मनोरंजनाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या ‘सन मराठी’ वाहिनीने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत यंदाची राखीपौर्णिमा आगळ्या पद्धतीने साजरी केली. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने ‘सन मराठी’च्या कलाकारांनी परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवले. मुलांशी संवाद साधत, गप्पा मारत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत कलाकारांनी हा सण अधिक खास केला.
 

sun marathi celebrates raksha bandhan with special children at narepark school 
या वेळी ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर, ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील समीर-अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, तसेच ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील वृंदा-मोहन म्हणजेच अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे आणि अभिनेता संग्राम समेळ उपस्थित होते.
या भेटीतील सर्वात भावस्पर्शी क्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या कलाकारांच्या मनगटावर प्रेमाने बांधल्या. कलाकारांनीही त्यांना भेटवस्तू देत त्यांचा दिवस संस्मरणीय केला. या निरागस आणि प्रेमळ क्षणांनी कलाकारही भावूक झाले. त्यांनी मुलांनी केलेल्या कलेचे तसेच त्यांच्या मेहनतीचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे केले.
या अनोख्या राखीपौर्णिमेचा अनुभव सांगताना अभिनेत्री योगिता चव्हाण भावूक झाली. ती म्हणाली, “आपण आजकाल एका अशा जगात जगतोय, जिथे अनेक गोष्टी खऱ्या असण्यापेक्षा दाखवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे मनापासून व्यक्त होणाऱ्या, कोणताही स्वार्थ नसलेल्या आणि अगदी निखळ अशा emotions ची आपल्याला फारशी सवय राहिलेली नाही. या मुलांना भेटल्यानंतर मात्र काही क्षणांसाठी हे सगळं विसरून त्यांच्यासोबत खूप सुंदर आणि मनापासूनचे क्षण अनुभवता आले. त्यांच्यासोबत वेळ घालवताना जाणवलं की, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या निरागसपणाने आणि प्रेमाने मनाला खूप स्पर्श केला.”
आपल्या भावना व्यक्त करताना योगिता चव्हाण पुढे म्हणाली, “या मुलांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत हे काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, यासाठी देवाचे आणि सन मराठीच्या टीमचे मनापासून आभार. आम्हाला आनंद झाला की नाही, यापेक्षा आमच्या येण्याने या मुलांना किती आनंद झाला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी का होईना, पण हसू आलं असेल, हा विचारच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आम्हाला मिळालेलं समाधान शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. कदाचित आमच्यासाठी हा फक्त काही तासांचा अनुभव असेल, पण आमच्या या छोट्याशा भेटीने त्यांच्या आयुष्यातला एखादा सुंदर क्षण तयार झाला असेल, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाही.”विशेष मुलांच्या हातून बांधलेली राखी, कलाकारांनी दिलेल्या भेटवस्तू आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव यामुळे यंदाची राखीपौर्णिमा ‘सन मराठी’च्या कलाकारांसाठीही भावनिक आणि अविस्मरणीय ठरली. सामाजिक बांधिलकी जपत साजरा केलेला हा सण माणुसकी, निरागसता आणि निखळ आनंदाचा सुंदर अनुभव देऊन गेला.