नाशिक
samruddhi expressway समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महामार्गावरील इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITNS) अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणेसाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सिन्नर इंटरचेंज ते भारवीर या दरम्यानची वाहतूक दररोज एका तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यापासून सलग तीन दिवस ही वाहतूक बंदी लागू राहणार असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ ते ४ या वेळेत थांबवण्यात येणार आहे. या निर्धारित वेळेत गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी संबंधित मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.समृद्धी महामार्गावरील अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयटीएनएस प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही नेटवर्क मजबूत करण्यात येत आहे.