मुंबई
sonam wangchuk आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटातील फुंगसूक वांगडू हे पात्र लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमिर खानने अलीकडेच या दाव्यावर स्पष्टीकरण देताना आपल्याला सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहितीच नव्हती, असं म्हटलं. आता वांगचूक यांनी आमिरच्या या दाव्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
युट्यूबर प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सोनम वांगचूक यांनी आमिर खानचं थेट नाव घेत टीका करण्याऐवजी त्याच्या ‘गजनी’ या चित्रपटाचा संदर्भ देत टोला लगावला. आमिर आणि आपली भेट झाली होती. इतकंच नव्हे, तर दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चाही झाली होती, असा स्पष्ट दावा त्यांनी केला.
वांगचूक म्हणाले, “त्यावेळी जेव्हा त्याने म्हटलं की, ‘आम्ही तर भेटलोच नव्हतो,’ तेव्हा नंतर काही व्हिडीओ समोर आले. त्यात तो ‘गजनी’च्या वेशात माझं एक भाषण पाहताना दिसत होता. कदाचित तो गजनीच्या वेशात असल्यामुळे त्याला शॉर्ट-टर्म मेमरी लॉस झाला असावा आणि 15 सेकंदांतच तो विसरला असेल. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण खरं तर आमची भेट खूप सविस्तरपणे झाली होती.”आपल्या भूमिकेत पूर्णपणे शिरून जाण्यासाठी आमिर खान ओळखला जातो, असं सांगत वांगचूक यांनी या संदर्भात आणखी एक मिश्किल टिप्पणी केली. “मी असं ऐकलंय की तो त्याच्या भूमिकेत पूर्णपणे शिरून जातो. त्यामुळे कदाचित तो गजनीच्या व्यक्तिरेखेत इतका रमला असेल की, मी पुरस्कार स्वीकारलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यालाही तो उपस्थित होता, हेसुद्धा कदाचित तो विसरला असेल. पण खरं सांगायचं तर आमची भेट खूप सविस्तर झाली होती आणि आमच्यात अनेक कल्पनांवर चर्चा झाली होती,” असं त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, ‘थ्री इडियट्स’ हा आपल्या आयुष्यावर आधारित बायोपिक असल्याचा दावा सोनम वांगचूक यांनी केलेला नाही. मात्र, आमिर खानसोबत झालेल्या भेटीत काही कल्पना आणि विचारांवर चर्चा झाली होती, असं त्यांनी सांगितलं. या चर्चेदरम्यान मांडलेल्या काही कल्पनांचा नंतर चित्रपटाच्या निर्मितीत वेगळ्या पद्धतीने वापर झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आमिर खानने भेटीदरम्यान sonam wangchuk झालेल्या चर्चेतून काही कल्पना घेतल्या असतील, त्या आपल्या टीमसोबत शेअर केल्या असतील आणि त्यानंतर त्या कल्पनांवर वेगळ्या पद्धतीने काम करून चित्रपटाची कथा विकसित केली असेल, असा अंदाज वांगचूक यांनी व्यक्त केला. या कल्पना नेमक्या कुठून आल्या, याची आमिरच्या सहलेखकांना किंवा दिग्दर्शकाला कदाचित माहिती नसावी, असंही त्यांनी म्हटलं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्याला फारसा आक्षेप नसल्याचंही वांगचूक यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, एखाद्या कलाकाराने चर्चेदरम्यान एखादी कल्पना घेतली असेल आणि त्याच्या टीममधील इतर सदस्यांना त्या कल्पनेचा स्रोत माहीत नसेल, तर त्यात विशेष काही गैर नाही.
आमिर खानने 2008 मध्ये ‘गजनी’ या चित्रपटात संजय सिंघानिया ही भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेला अल्पकालीन स्मृती गमावण्याची, अर्थात शॉर्ट-टर्म मेमरी लॉसची समस्या असते. याच व्यक्तिरेखेचा संदर्भ घेत सोनम वांगचूक यांनी आमिरच्या विस्मरणावर विनोदी शैलीत भाष्य केल्याने त्यांच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.