चेन्नई
rahul gandhi तामिळनाडूत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली TVKच्या सरकारमध्ये काँग्रेसचीही महत्त्वाची भूमिका असताना आता दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री राजेश कुमार यांनी TVKला थेट इशारा देत, २०२९ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होण्यास पक्षाने सहमती दर्शवली नाही, तर सरकारमधील काँग्रेसचे दोन मंत्री आपल्या पदांचा राजीनामा देतील, असे म्हटले आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे एका सभेला संबोधित करताना राजेश कुमार यांनी हा इशारा दिला. “काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे २०२९ मध्ये भारताचे पंतप्रधान होतील. तमिळगा वेट्री कळगम (TVK) याला सहमत नसेल, तर TVKच्या मंत्रिमंडळात असलेले काँग्रेसचे दोन मंत्री आपल्या पदांचा राजीनामा देतील,” असे कुमार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१९६७ नंतर प्रथमच तामिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अण्णाद्रमुक यांच्याव्यतिरिक्त अन्य पक्ष सत्तेवर आला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. राज्य विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे, तर TVKकडे १०८ जागा आहेत. याशिवाय काँग्रेसच्या पाच आमदारांचा सत्ताधारी आघाडीला पाठिंबा आहे.सत्ताधारी TVK सरकारला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, विदुथलाई चिरुथाइगल काची (VCK) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) यांच्या प्रत्येकी दोन आमदारांचा बाहेरून पाठिंबा मिळत आहे. TVKने या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसला मंत्रिमंडळात दोन मंत्रीपदे तसेच राज्यसभेची एक जागा दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि TVK यांच्यातील संबंधांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, TVK सरकारने तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सुरक्षेबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सचिवालयात सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर तामिळनाडू पोलिसांच्या कोअर सेल सिक्युरिटी विंगने स्टॅलिन यांची सुरक्षा Z+ श्रेणीतून कमी करून Z श्रेणीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्टॅलिन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५४ वरून ३४ करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्या २०२९ मधील पंतप्रधानपदाच्या दाव्यावरून काँग्रेस मंत्र्यांनी दिलेला हा इशारा आणि त्याचवेळी स्टॅलिन यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली कपात यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात सत्ताधारी TVKसमोर नवी राजकीय समीकरणे आणि आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे.