प्रफुल्ल व्यास
वर्धा,
municipal council elections ज्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वतः विदेशी कपड्यांची होळी केली होती, ते ठिकाण वर्धा नगर पालिकेकडून आजही उपेक्षित आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत ‘टिळक पुतळा’ हा विषय चांगलाच पेटला होता. नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे तत्कालीन बांधकाम सभापती उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. आता तेच विचारतात की, टिळक पुतळ्याचे काय झाले? त्यांच्या या प्रश्नावरून आता उलट प्रश्नांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या जवळचे असलेले हे महाशय सत्तेत असताना काय करीत होते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वर्धेतील गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या परिसरात जाजोदिया यांनी बगीचासाठी नगर परिषदेला जागा दान दिली. त्याच परिसरात लो. टिळकांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. ती भेट वर्धेकरांच्या कायम स्मरणात राहावी यासाठी त्याच परिसरात सिमेंटची पाटी लावण्यात आली होती. त्यानंतर केसरी वृत्तपत्रातील अग्रलेखही त्याच ठिकाणी लावण्यात आले होते. तत्कालीन नगराध्यक्ष शेंडे यांनी नगर पालिकेच्या वतीने गोलबाजारात अर्धाकृती पुतळा बसवून लोकमान्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून लोकमान्यांच्या पुतळ्याभोवती घाणीचे साम्राज्य आहे.
नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या नेतृत्वात नपत भाजपाची एकहाती सत्ता आली. किटे हे बांधकाम सभापती होते. त्या काळातही टिळकांचे भाग्य उजळले नाही. सेवाग्राम विकास आराखडाही वर्धेच्या विकासाला हातभार लावणारा ठरला. परंतु, त्याही काळात टिळक उपेक्षितच राहिले.municipal council elections त्यानंतर नपकडून टिळक पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा अजेंडा पुढे येत गेला. परंतु, तो कागदोपत्रीच राहिला. नप निवडणुकीत टिळक पुतळ्याचा विकास हा विषय ‘तरुण भारत’मधून सातत्याने उपस्थित केला गेला. नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे सुधीर पांगुळ निवडून आले. १४ ऑगस्ट रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अ. भा. आर्यवत संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला भेट दिल्याने पुन्हा तोच विषय चर्चेत आला. नपच्या एका कर्मचार्याने नगरसेवक त्रिवेदी यांच्यासह भेट देऊन आराखडा समजावून सांगितला. आजही पुतळ्याच्या भोवताली घाणीचे साम्राज्यच आहे. दरम्यान, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष, पराभूत उमेदवार निलेश किटे यांनी, ‘काय झाले टिळक पुतळ्याचे, नवीन नगराध्यक्ष करणार होते ना?’ असा सवाल केला. तराळे यांच्या नेतृत्वात असलेल्या सत्तेत तुम्ही बांधकाम सभापती होता ना... त्यावेळी काय केले, असा प्रतिप्रश्न नागरिक करीत आहेत. वर्धेतील विरोधकच सोडा सत्ताधार्यांनीही टिळकांकडे दुर्लक्षच केले हे वास्तव आहे.