नागपूर,
Manmanthyan मनमंथन नोंदणीकृत साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थेचा सहावा वर्धापन दिन पावसामुळे आभासी पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी-लेखक अमोल देशपांडे, प्रमुख पाहुण्या कवयित्री-लेखिका रेखा भिवगडे व गायिका चित्रा गोखले उपस्थित होत्या.यावेळी संस्थेतर्फे 'आशाताई... गाण्यांचा अवखळ झरा' या आशा भोसले यांच्या गीतांच्या रसग्रहणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील लेख संस्थेतील लेखकांनी लिहिले आहेत. वर्धापन दिनानिमित्त 'नशीब' या विषयावरील मुक्तछंद काव्यरचना आणि आशा भोसले यांच्या गीतांच्या सादरीकरणाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण कार्यक्रमात झाले.
अध्यक्षीय भाषणात अमोल देशपांडे यांनी लेखकाने उत्तम वाचक असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रेखा भिवगडे यांनी काव्यरचना व्याकरणदृष्ट्या निर्दोष ठेवण्याचा सल्ला दिला, तर चित्रा गोखले यांनी गायन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.दीपप्रज्वलन शुभांगी तिवारी यांनी केले. सूत्रसंचालन मंजुषा विश्वेकर, तर आभार प्रदर्शन प्रीती दीक्षित यांनी केले. देशासह परदेशातील सभासदांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणा वाडी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष प्रदीप वाडी यांच्यासह नंदिनी खाडे, अलंका टिकेकर, पल्लवी पांडे, रश्मी कुलकर्णी, वंदना पांडे, समीक्षा हळबे आणि सर्व सभासदांनी सहकार्य केले.
सौजन्य : वर्षा विजय देशपांडे,संपर्क मित्र