नागपूर,
nagpur-leads-the-solar-revolution केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर - मोफत वीज योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख १ हजार ८१५ ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारून या हरित क्रांतीत सहभाग नोंदवला आहे.महावितरणच्या राज्यभरातील ७.१० लाख छतावरील सौर प्रकल्पांपैकी एकट्या नागपूरचा वाटा १४.३३ टक्के आहे. तर राज्यातील एकूण २६९०.२६ मेगावॅट क्षमतेपैकी ३९१.५१ मेगावॅट म्हणजे १४.५५ टक्के वीज एकट्या नागपूर जिल्ह्यात निर्माण होत आहे. यात नागपूर शहरात ८४,३४७ तर ग्रामीण भागात १७,४६८ ग्राहकांनी हे प्रकल्प बसवले आहेत.
भरघोस अनुदान अन् मोठी आर्थिक बचत
- -या योजनेत १ ते ३ किलोवॅटसाठी ३० हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते.
- -जिल्ह्यातील १,०१,५१६ ग्राहक ७६०.८५ कोटी रुपयांच्या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.
- -यापैकी ९३,६५१ ग्राहकांच्या खात्यात ७२९.८८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
'नेट मीटरिंग'मुळे ग्राहक बनला 'वीज निर्माता'
सौर ऊर्जेच्या वापरामुळे सुरुवातीची गुंतवणूक ३ ते ४ वर्षांत वसूल होऊन पुढील २०-२५ वर्षे मोफत वीज मिळते. 'नेट मीटरिंग'च्या सुविधेमुळे अतिरिक्त वीज महावितरणला विकून बिलात सवलत मिळते. यामुळे सामान्य ग्राहक आता केवळ वीज वापरकर्ता न राहता 'वीज निर्माता बनला आहे.
पिपरी ठरले जिल्हयातील पहिले 'सौरग्राम'
हिंगणा तालुक्यातील पिपरी हे आदिवासी बहुल गाव जिल्हयातील पहिले 'सौरग्राम' ठरले आहे. 'एस.डब्ल्यू.ए. कॅल्डरीज' कंपनीने सीएसआर निधीतून उर्वरित आर्थिक भार उचलून संपूर्ण गावाचे सौरग्राममध्ये रूपांतर केले.