वाशीम,
har ghar tiranga ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणारे ’हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि व्यापक लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून सोपविलेल्या जबाबदार्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या जिल्हास्तरीय बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अभियानाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित असून, त्यानिमित्त जिल्हाभर सामूहिक वंदे मातरम् गायन, प्रभात फेर्या, बाईक रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध स्तरांवर प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्याचा योग्य वापर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सांगितले की, हर घर तिरंगा अभियानाला पाठबळ देण्यासाठी विदर्भ विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विहित मानकांनुसार तयार करण्यात आलेले हे ध्वज शासकीय कार्यालये, संस्था, संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना टपाल कार्यालयांच्या काउंटरवर उपलब्ध आहेत.har ghar tiranga अभियानाच्या कालावधीत भारताच्या ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा, असेही त्यांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी टपाल विभागाचे विपणन कार्यकारी होनमने यांच्याशी संपर्क साधता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.