इस्लामाबाद,
Pakistan wins with Babar Azam's वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने दमदार कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला आणि तब्बल ११०५ दिवसांपासून सुरू असलेल्या परदेशातील कसोटी विजयाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. या विजयासह दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत संपली. चौथ्या डावात विजयासाठी मिळालेले अवघे ७४ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सहज पार केले. बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक हे दोघेही प्रत्येकी २४ धावांवर नाबाद राहिले.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ३४४ धावा उभारल्या. त्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल्ला शफीकच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३८७ धावा करत ४३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात अली उस्मान आणि साजिद खान यांनी मिळून ८ बळी घेत वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ११७ धावांत गुंडाळला. त्यामुळे पाकिस्तानसमोर ७४ धावांचे सोपे लक्ष्य उभे राहिले आणि त्यांनी दोनच गडी गमावत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाकिस्तानचा यापूर्वीचा परदेशातील कसोटी विजय २७ जुलै २०२३ रोजी श्रीलंकेविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर सलग ११०५ दिवस पाकिस्तानला परदेशात एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता.विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध मिळालेला विजय आणि आता वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेला विजय या दोन्ही वेळी पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमकडेच होते. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शान मसूदला कसोटी कर्णधारपदावरून हटवत बाबर आझमकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती आणि त्यानंतर लगेचच संघाने विजयाची नोंद केली. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा कसोटीतील प्रवास निराशाजनक ठरला होता. त्याच्या कर्णधारपदात संघाने १६ कसोटी सामने खेळले, त्यापैकी केवळ ४ सामने जिंकता आले. दुसरीकडे, बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आतापर्यंत २२ कसोटी सामन्यांपैकी ११ सामन्यांत विजय मिळवला असून, या यशामुळे त्याच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.