अमरावती,
bapusaheb deshmukh कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपणारे, नागरवाडी इंद्रभुवनचे शिल्पकार आणि गाडगेबाबा मिशन मुंबईचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी पहाटे २.३० वाजता निधन झाले.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी या गाडगेबाबांच्या अंतिम श्रद्धास्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बापूसाहेब देशमुख यांना संत गाडगेबाबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या शाळा, आश्रमशाळा आणि धर्मशाळांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यात बापूसाहेबांचा मोलाचा वाटा होता.
त्यांच्या निधनाने गाडगेबाबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून जगणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून सामाजिक क्षेत्रात मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली व आप्तपरिवार आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खासदार अनिल बोंडे यांच्यासह अनेकांनी बापूसाहेबांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करून आदरांजली अर्पण केली आहे.