मुंबई
ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील कोट्यवधी महिला ज्या जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत, तो हप्ता 15 ऑगस्टपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात ही रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता असल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी निधी वर्ग करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर हप्ता वितरणाच्या अधिकृत तारखेबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची मिळून 3,000 रुपयांची रक्कम एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.दुसरीकडे, राज्यभरात राबविण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्याचवेळी सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्याची चिन्हे आहेत.जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी योजनेच्या आवश्यक अटींची पूर्तता केलेली असणे गरजेचे आहे. संबंधित महिलेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी, तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरीत्या झालेली असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित महिला योजनेच्या सर्व निकषांमध्ये आणि पात्रतेत बसणेही गरजेचे आहे.ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असलेल्या किंवा कागदपत्रांच्या छाननीदरम्यान त्रुटी आढळलेल्या महिलांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांनाही या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी, कागदपत्रांची पडताळणी आणि योजनेतील पात्रतेची स्थिती वेळेत तपासून घेणे आवश्यक आहे.