मालेगाव,
Demand by MNS Krushi Sena पावसाअभावी परिसरातील शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कृषी सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

शेतकरी मोठ्या आशेने कर्ज घेऊन शेतीची पेरणी करीत आहे. मात्र, एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीन पिकांची परिस्थिती गंभीर झाली असून शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक संकटांना सामोरे जाऊनही शेतकरी प्रामाणिकपणे आपले काम करीत असून, आज तो हताश व निराश झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ सोयाबीन पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पात्र शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कृषी सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कृषी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला.