मुंबई,
lalbagcha raja mumbai गणेशोत्सव काळात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव ही खास आकर्षण केंद्र असतात. मुंबईतीलच नव्हे, तर राज्यासह देश विदेशातील भाविक, पर्यटक या ठिकाणी गणपती पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी करतात. लांबच लांब रांगा, रस्त्यावरील विद्युत रोषणाई आणि विक्रेत्यांनी समस्त परिसर दिवस रात्र गजबजलेला असतो. या कालावधीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मात्र वेगळेच बळ आलेले असते. तीन वर्षांपूर्वी पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविक महिलेला सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

अन्य प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणीही अशा स्वरूपाच्या घटना दरवर्षी घडत असतात. दूरवरचा प्रवास करून तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांना धक्काबुक्की करणे, त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे, शिवीगाळ करणे, धमकावणे, स्त्रियांशी असभ्य भाषेत बोलणे, परिचयाच्या माणसांना रांगेत पुढे घेऊन जाणे यांसारखे प्रकार काही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून घडताना सर्रासपणे पाहायला मिळतात. त्यामुळे गणेशोत्सवाचा राजा नेमका कोण ? गणपती कि कार्यकर्ता हा प्रश्नच पडतो. कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने मंडळासह उत्सवाच्या प्रतिमेलाही धक्का लागतो. त्यामुळे अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.