मुंबई
sugar prices ऐन गणेशोत्सवात ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरात साखरेच्या दरात घसरण झाली असून 12 ते 16 रुपयांनी किंमती कमी झाल्या आहेत. मुंबईत 22 ऑगस्ट रोजी साखरेचा दर 68 रुपये प्रति किलो होता, तो आता 14 सप्टेंबर रोजी 54 रुपयांवर आला आहे.
केंद्र सरकारने सर्व साखर कारखान्यांना केवळ दिलेल्या पाक्षिक कोट्यानुसारच साखर विक्री आणि पुरवठा करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी साखर विकल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल. या कारखान्यांवर अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील शिल्लक साखर दुसऱ्या पंधरवड्यात विकण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारखान्यांना मिळालेल्या कोट्यानुसारच ठरलेल्या कालावधीत साखर विकावी लागणार आहे.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने 30 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 587 साखर कारखाने आणि 2 रिफायनरींना सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी 13 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कोटा उत्तर प्रदेशला मिळाला असून, सुमारे 4.20 लाख टन साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तर महाराष्ट्राला 4.10 लाख टन आणि कर्नाटकला 1.77 लाख टन कोटा मिळाला आहे. तसेच तामिळनाडू, गुजरात, बिहार आणि पंजाब या राज्यांना 24 हजार ते 44 हजार टनांदरम्यान कोटा देण्यात आला आहे.
विविध शहरातील साखरेचे आजचे दर-
मुंबईत साखर 14 रुपयांनी स्वस्त होऊन 54 रुपये प्रति किलो झाली आहे.
दिल्लीत 13 रुपयांची घसरण होऊन दर 55 रुपये आहे.
कानपूरमध्ये सर्वाधिक 16 रुपयांची घसरण झाली असून आजचा दर 53 रुपये किलो आहे.
रायपूरमध्ये 13 रुपयांनी घसरण होऊन साखर 55 रुपयांना मिळत आहे.
कोलकातामध्ये 15 रुपयांच्या घसरणीनंतर दर 55 रुपये आहे.
हैदराबादमध्ये 16 रुपयांनी दर कमी होऊन 54 रुपये किलो झाला आहे.
चेन्नईमध्ये 12 रुपयांच्या घसरणीनंतर साखर 58 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.