मुंबई
suraj pancholi दिवंगत दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेता सूरज पांचोली याचे नाव समोर आल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिशा सालियान यांच्या मृत्यूभोवती विविध दावे आणि आरोप केले जात आहेत. या प्रकरणाशी बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नावेही जोडली गेली आहेत. दरम्यान, या प्रकरणात आपले नाव वारंवार घेतले जात असल्याने अभिनेता सूरज पांचोलीने अखेर मौन सोडले आहे.
सूरज पांचोलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. दिशा सालियान यांच्याशी आपला कोणताही संबंध नव्हता, इतकेच नव्हे तर आपण त्यांना आयुष्यात कधीही भेटलो नसल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे ज्या प्रकरणाशी आपला थेट संबंध नाही, त्यात वारंवार आपले नाव जोडले जाणे अत्यंत त्रासदायक असल्याचे त्याने म्हटले आहे.
सूरजने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून दिशा सालियान यांच्या दुर्दैवी मृत्यूशी संबंधित विविध मीडिया रिपोर्ट्स आणि निवेदनांमधून त्याचे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. सुरुवातीला त्याने या विषयावर मौन बाळगण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक बातमी किंवा अहवालावर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते, असे त्याचे मत होते. मात्र, वारंवार आपले नाव या वादात ओढले जात असल्याने आता काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटत असल्याचे त्याने नमूद केले.
आपला दिशा सालियान यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता आणि आपण त्यांना कधीच भेटलो नाही, असे सूरजने स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच, आपण आदित्य ठाकरे यांनाही कधी भेटलो नसल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना आपले नाव त्यात जोडले जात असल्याचे त्याने म्हटले आहे.
या प्रकरणातील तपास यंत्रणांसमोर आपण यापूर्वीच आपले म्हणणे मांडले असल्याचेही सूरजने पोस्टमध्ये नमूद केले. भविष्यात या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याची आवश्यकता भासल्यास तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी त्याने व्यक्त केली आहे.
सूरजच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रकरणाशी त्याचा कोणताही संबंध नाही, त्यात वारंवार त्याचे नाव घेतले जाणे चुकीचे आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे. विशेषतः आपला या प्रकरणाशी संबंध असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा किंवा ठोस आधार उपलब्ध नसताना अशा प्रकारे नाव जोडले जाणे योग्य नसल्याचे त्याने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर सूरजने माध्यमांना आणि संबंधितांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीचे नाव जोडण्यापूर्वी उपलब्ध तथ्यांची आणि वस्तुस्थितीची योग्य प्रकारे पडताळणी करावी, एवढीच आपली विनंती असल्याचे त्याने स्पष्ट केले. दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सविस्तर चौकशी व्हावी, तसेच या तपासाला आपण पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचेही सूरजने सांगितले आहे.
दिशा सालियान यांच्या मृत्यूला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाभोवतीचे आरोप-प्रत्यारोप आणि विविध दावे कायम आहेत. अशा परिस्थितीत आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने सूरज पांचोलीने सार्वजनिकरित्या आपली बाजू मांडली असून, तपास यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.