तिरुनेलवेली
ganesha banner controversy भगवान गणेशाची प्रतिमा असलेला बॅनर लावून बिर्याणी विक्रीची जाहिरात केल्याने तिरुनेलवेलीमध्ये वाद निर्माण झाला. या बॅनरमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बॅनर हटवून दुकानमालक जयंत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविले.
ही घटना तिरुनेलवेलीतील व्ही. एम. चत्रम परिसरात घडली. या भागातील ‘डिंडिगुल कल्याणा बिर्याणी’ या दुकानाबाहेर भगवान गणेशाची प्रतिमा असलेला बॅनर लावण्यात आला होता. स्थानिक बिल्डर सेल्वराज यांच्या निदर्शनास हा बॅनर आल्यानंतर त्यांनी याबाबत आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली. भगवान गणेश हे हिंदू समाजाचे पूजनीय दैवत असून, त्यांच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर करून अवमान करण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सेल्वराज यांनी केला.सेल्वराज यांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅनर नेमका कोणत्या उद्देशाने लावण्यात आला होता, त्यामागील कारण काय होते, यासह विविध बाबींची चौकशी सुरू केली. तपासानंतर बिर्याणी दुकानाचा मालक जयंत (३०) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कारागृहात पाठविले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित बॅनरही तातडीने हटविला.
दरम्यान, गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मकनपूर दरगाह शरीफ येथे चेहल्लुमच्या कार्यक्रमादरम्यान बिर्याणी वाटपावरून गोंधळ उडाल्याची घटना समोर आली होती. ताजिये थंड करण्याचा कार्यक्रम सुरू असताना बिर्याणी घेण्यासाठी मोठी गर्दी जमली. त्यामुळे वाटप करणारे ताजिया कार्यकर्ते तेथून बाजूला झाले आणि गर्दीतील काही जणांनी स्टँडवर ठेवलेली बिर्याणीची संपूर्ण डेग खाली पाडली. त्यानंतर बिर्याणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
या गोंधळात अनेकांचे कपडे खराब झाले, तर धक्काबुक्की आणि झटापटीदरम्यान काही तरुणांना नखांमुळे ओरखडेही आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी या प्रकाराचे चित्रीकरण केले होते. या घटनेचा व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.
चेहल्लुमला अरबी भाषेत ‘अरबाईन’ असे म्हटले जाते. फारसी भाषेत त्याचा अर्थ ‘चाळीसावा’ असा होतो. मोहरम महिन्यात करबला येथील युद्धात हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर ४० दिवसांनी, म्हणजेच सफर महिन्याच्या २० तारखेला चेहल्लुम पाळला जातो.