प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
poisoned गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे घडली. बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिकांनी तातडीने सर्व मुलांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
 

Erandachya Biya Khallyane poisoned 13 children as Prasad. 
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुले परिसरात एकत्र आली होती. या मुलांनी मातीचा गणपती तयार करून त्याची स्थापना केली. त्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती केली. आरतीनंतर प्रसाद वाटण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हता. त्यामुळे परिसरात सहज उपलब्ध असलेल्या एरंडाच्या बिया त्यांनी प्रसाद म्हणून खाल्ल्या.
एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीला उलट्या होण्यासह अस्वस्थता जाणवली. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने गावात चिंता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी सर्व मुलांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मुलांवर उपचार सुरू केले. एकाच घटनेत १३ मुलांना त्रास झाल्याने वैद्यकीय यंत्रणेकडून त्यांच्यावर आवश्यक देखरेख ठेवण्यात येत आहे. सुदैवाने उपचारांना प्रतिसाद मिळाला असून, सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या घटनेमुळे गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक आणि कौटुंबिक उत्सवांच्या काळात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही अनोळखी बिया, फळे किंवा वनस्पतींचे भाग खाद्य आहेत की नाहीत, याची खात्री नसताना ते खाणे टाळणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांना अनोळखी वनस्पती, बिया किंवा फळे खाण्यापासून रोखण्याची गरज आहे.
गणपतीची आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाल्याच्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा असून, सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.