नवी दिल्ली
pm modi केंद्र सरकारच्या रोजगार मेळ्याच्या २०व्या टप्प्यात आज देशभरातील ४५ ठिकाणी ५१ हजार तरुणांना विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या तरुणांना संबोधित करणार आहेत. या रोजगार मेळ्यांत आतापर्यंत एकूण १२ लाख ७५ हजार तरुणांना विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत.
आजच्या रोजगार मेळ्यात निवड झालेल्या उमेदवारांना महसूल विभाग, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग तसेच संरक्षण मंत्रालयासह अन्य सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळणार आहे. देशाच्या विविध भागांत एकाच वेळी होणाऱ्या या कार्यक्रमातून निवड झालेल्या तरुणांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत.
तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे. रोजगार मेळा हा सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच तरुणांना त्यांच्या कौशल्याचा आणि क्षमतेचा उपयोग करण्यासाठी व्यासपीठ देणारा उपक्रम असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. रोजगाराच्या संधी वाढवून देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचा सहभाग अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी २३ मे रोजी १९वा रोजगार मेळा झाला होता. त्या वेळीही ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ‘विकसित भारत’ाच्या दिशेने सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीला गती देण्यात भारतातील तरुण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले होते. रोजगार मेळा हा तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याच्या सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
भारत जगातील विविध देशांसोबत भागीदारी वाढवत असून, या सहकार्याचा उद्देश भारतीय तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या क्षमतेला वाव देणे हा असल्याचेही पंतप्रधानांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
दरम्यान, यापूर्वी उत्तराखंडमध्ये अग्निवीर रोजगार सेलची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सैन्यधाम हे उत्तराखंडच्या समृद्ध वारशाचे प्रतीक बनेल, असे म्हटले होते. रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सातत्याने तरुणांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.